शाश्वत विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण हीच खऱ्या लोककल्याणकारी सरकारची ओळख असते. महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गतिमान आणि संवेदनशील निर्णयप्रक्रियेच्या माध्यमातून याचाच एक नवा वस्तुपाठ महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील ३० गावांना जोडणाऱ्या रखडलेल्या पुलाचा प्रश्न फक्त एका फोनवर तात्काळ निधी मंजूर करून मार्गी लावला आहे. शहरांचा कायापालट करणारे, भविष्याचा विचार करून दीर्घकालीन प्रकल्प राबविण्याबरोबर, दुर्गम भागातील शेवटच्या घटकाच्या अडचणींवरही तितक्याच संवेदनशीलतेने आणि वेगाने मार्ग काढणारे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे आणि दिलासा देणारे ठरत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यातील टेकडाताल्ला – कांबलपेठा मार्गावरील अट्टीवागू नाल्यावरील रखडलेल्या पुलाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे मार्गी लागला आहे. यामुळे या परिसरातील ३0 गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सरकारने मंजुरी दिली होती. पण संबंधित विभाग आणि ठेकेदाराने फक्त पिलर उभारून उर्वरित कामे गेल्या दीड वर्षांपासून अर्धवट अवस्थेत सोडून दिली होती. हा पूल टेकडा भागातील नागरिकांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. शाळा-कॉलेज, हॉस्पिटल आणि सरकारी कामांसाठी नागरिकांना याच मार्गाचा वापर करावा लागतो. पण काम रखडल्याने लोकांना जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करावा लागत होता. येणाऱ्या पावसाळ्यात नाल्याला पाणी आल्यास हा मार्ग पूर्णपणे बंद होऊन ३० गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली होती. याबाबत नागरिकांनी संबंधित विभागाला अनेकवेळा निवेदने दिली होती. पण प्रशासनातील काही ढिम्म अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परिणामी संतापलेल्या नागरिकांनी २५ मे पासून सिरोंचा तहसील कार्यालयासमोर या अर्धवट बांधकामाविरोधात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते.
स्थानिकांच्या या आंदोलनाची आणि हक्काच्या मागणीची मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आणि गांभीर्याने दखल घेतली. संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेत आंदोलनकर्त्या ग्रामस्थांशी थेट फोनवरून संपर्क साधला आणि त्यांच्या अडचणी सविस्तरपणे जाणून घेतल्या. ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या पुलाच्या उर्वरित बांधकामासाठी लगेच ३.२० कोटी निधी मंजूर केला. फक्त निधी मंजूर करून न थांबता त्यांनी संबंधित विभागाला या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही दिले.
मुख्यमंत्र्यांच्या या एका फोनमुळे आणि क्षणाचाही विलंब न लावता घेतलेल्या तात्काळ निर्णयामुळे गेल्या दीड वर्षांपासून रेंगाळलेला अट्टीवागू नाल्यावरील पुलाचा प्रश्न काही तासांत सुटला. पावसाळा तोंडावर आलेला असताना प्रशासकीय दिरंगाईमुळे हवालदिल झालेल्या दुर्गम भागातील हजारो नागरिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या जलद प्रतिसादामुळे आता पावसाळ्यातही या ३० गावांचा संपर्क अखंडित राहण्यास मदत होणार आहे. टेकडा परिसरातील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या या संवेदनशील कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
संबंधित लेख:
- गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा ते भारताचे ‘स्टील हब’; देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील परिवर्तनयात्रा
- देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची नक्षलमुक्तीच्या दिशेने वाटचाल!
- नक्षलमुक्त भारत, नक्षलमुक्त महाराष्ट्र: रक्ताळलेल्या संघर्षाचा अंत आणि विकासाची नवी पहाट
- इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प अन् गडचिरोलीची स्टील हबच्या दिशेने वाटचाल
