महाराष्ट्रातील नक्षलवाद – संघर्ष, कारवाई आणि परिवर्तनाचा प्रवास
महाराष्ट्रातील नक्षलवाद - संघर्ष, कारवाई आणि परिवर्तनाचा प्रवास
महाराष्ट्रातील नक्षलवादाचा इतिहास आणि प्रवास हा सुमारे अर्धशतकापासून सुरू असलेल्या सशस्त्र संघर्ष, सामाजिक असंतोष आणि विकासाच्या विषमतेशी जोडलेला आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील भाग हे दीर्घकाळ नक्षलवादाचे प्रमुख केंद्र राहिले. या नक्षलवादी चळवळीच्या मुळाशी आदिवासी भागातील दुर्लक्षित विकास, शैक्षणिक मागासलेपणा आणि तत्कालीन सरकारवरील अविश्वास असल्याचे दिसून येते. त्यामुळे महायुती सरकारने गेल्या दोन दशकांत या समस्येचा नायनाट करण्यासाठी सर्वसमावेशक भूमिका स्वीकारून नवीन दृष्टिकोन स्वीकारला. एकीकडे कठोर सुरक्षा कारवाई, तर दुसरीकडे आत्मसमर्पण, पुनर्वसन आणि स्थानिक विकासाच्या योजनांचा संगम साधला गेला. विशेषतः २०१४ ते २०२५ या कालावधीत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादाच्या विरोधात कठोर धोरण स्वीकारून महाराष्ट्र नक्षलमुक्त मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजना, सुरक्षा यंत्रणांचे आधुनिकीकरण आणि गडचिरोलीसह नक्षलप्रभावित भागांत पायाभूत विकास, शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या योजना राबवण्यात आल्या. स्थानिकांचा विश्वास संपादन करून, विकासाचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवून नक्षलवादाच्या मुळावर प्रहार करण्यात त्यांना यश मिळत आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त करण्याची घोषणा वास्तवात उतरताना दिसत आहे. महाराष्ट्राने या राष्ट्रीय प्रश्नाविरोधात ठोस पावले उचलल्यामुळे आज नक्षलवादमुक्त महाराष्ट्र हे धोरण निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.
ऑगस्ट
ऑगस्ट
जानेवारी
फेब्रुवारी
एप्रिल
ऑक्टोबर
जून
जुलै
ऑक्टोबर
जानेवारी
जून
ऑगस्ट
ऑक्टोबर
फेब्रुवारी
मार्च
मे
जून
२००५
२९
ऑगस्ट २००५
नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना
धुळे, उत्तर जळगांव या विभागातदेखील चालू आहेत. नक्षलवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने समन्वय केंद्र स्थापन केले आहे. त्याअंतर्गत नक्षलवाद्यांचे मन परिवर्तन करून त्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी योजना आणली होती. या योजनेचे उद्दीष्ट, नक्षलवाद्यांची चळवळ पूर्णपणे बंद करणे व त्यांचे मनुष्यबळ कमी करुन त्यांच्याकडे आकर्षित होणाऱ्या स्थानिक लोकांना चळवळीतून बाहेर काढणे व त्यांना पुन्हा नक्षलवादाकडे वळू न देणे. नक्षलवादी आत्मसमर्पित होण्यासाठी आकर्षक योजना पुरविणे. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना पुढील काळामध्ये कायद्याचे पालन करणारे जबाबदार नागरिक म्हणून जीवन जगण्यास प्रवृत्त करणे. आत्मसमर्पण केल्यानंतर फायदे मिळतात म्हणून कोणीही मुद्दाम नक्षलवादी चळवळीत समाविष्ट होऊन त्यांनतर आत्मसमर्पित झाल्याचे दर्शवून फायदे उपभोगणार नाहीत याची काळजी घेणे, असे आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना भरपाई म्हणून त्यांच्या पदानुसार रक्कम / बक्षीस दिली जाणार आहे.
Read More
२०१४
२६
ऑगस्ट २०१४
नक्षलवाद्यांसाठी सुधारित आत्मसमर्पण योजना
केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचना तसेच चालू योजना राबवताना आलेला अनुभव विचारात घेऊन नक्षलवाद्यांसाठी सुधारित आत्मसमर्पण योजना राबवण्यास तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने २६ ऑगस्ट २०१४ च्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली. नवीन योजनेनुसार आत्मसमर्पण केलेल्या सदस्यांना जास्तीची रक्कम देण्यास सरकारने मंजुरी दिली. त्याचबरोबर अतिरिक्त सहाय्य म्हणून दिल्या जाणाऱ्या रकमेतही वाढ करण्यात आली. दरम्यान, २००५ च्या शासन निर्णयाद्वारे नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली होती. या योजनेस ऑगस्ट २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Read More
२०१६
३०
जानेवारी २०१६
नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजनेस मुदतवाढ
राज्यातील नक्षलवाद्यांसाठी दिनांक २९ ऑगस्ट २००५ च्या शासन निर्णयानुसार आत्मसमर्पण योजना जाहीर केली होती. त्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने १ जानेवारी २०१३ पासून आत्मसमर्पण योजनेत वेळोवेळी बदल करून त्याची सुधारित आत्मसमर्पण योजना राबवली. तसेच त्याला त्याच्या आवश्यकतेनुसार मुदतवाढदेखील देण्यात आली. त्यावेळच्या सरकारने सदर योजनेला २९ ऑगस्ट २०१५ पर्यंत मुदतवाढ दिली होती. दरम्यान, ऑक्टोबर २०१४ नंतर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांंच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले. त्यांच्या सरकारने या योजनेला २९ ऑगस्ट २०१५ ते २८ ऑगस्ट २०१७ या कालावधीसाठी मुदतवाढ दिली.
चंद्रपूर मार्गावरील नवेगावजवळील मौजा मुरखळा येथे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या नवजीवन नवनगर या वसाहतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ फेब्रुवारी २०१६ मध्ये केले. ही देशातील पहिलीच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची वसाहत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भूखंड मिळालेल्या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांशी संवाद साधून त्यांनी मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. जंगलातील नक्षल चळवळ सोडून हिंसेच्या मार्गाचा त्याग करणाऱ्या नक्षलवाद्यांना पुढील जीवन सुखसमाधानाने जगता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदतीसह रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. त्याचबरोबर त्यांना राहण्याकरीता, घरबांधण्यासाठी सरकारद्वारे २००५ पासून भूखंड वितरण योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी ५.५३ हेक्टर जमीन मंजूर करण्यात आली. या जागेवर ३० बाय ३० चौरस फुटाचे एकूण १७४ भूखंड तयार करण्यात आले आहे. या जागेवर अंगणवाडी, शाळा, समाज मंदिराकरीता २,७६९ चौरस मीटर, बाजारासाठी ५१३ चौरस मीटर आणि ३,४०८ चौरस मीटर मोकळी जागा ठेवण्यात आली. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांकडून घरबांधणीसाठी केलेलया भूखंडाच्या मागणीनुसुार गडचिरोलीच्या पोलीस अधिक्षकांनी एकूण १०६ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना भूखंड वितरित केले आहेत.
बर्गी (येल्मी) येथील पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बर्गी (येल्मी) येथे नक्षली चळवळींनी ग्रस्त झालेल्या परिसरात पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. या मदत केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
आत्मसमर्पित ६० नक्षलवादी एसटीत कंडक्टर म्हणून नियुक्त
राज्य सरकारच्या आत्मसमर्पण योजनेंतर्गत एसटी महामंडळाने आत्मसमर्पण केलेल्या ६० नक्षलवादी तरुणांना कंडक्टर म्हणून नोकरी दिली आहे. या तरुणांना दीड महिन्यांचे प्रशिक्षण दिल्यानंतर ते एसटीमध्ये वाहक म्हणजेच कंडक्टर म्हणून रुजू झाले आहेत. नक्षलवादी तरुणांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारद्वारे विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यात एसटी महामंडळाकडून बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प योजना ही नवीन योजना राबवली गेली. या योजनेच्या माध्यमातून नक्षलग्रस्त तरुणांचे पुनर्वसन केले गेले. गडचिरोलीतील ६० नक्षलवादी तरुणांना एसटी महामंडळाकडून नोकरीत सामावून घेण्यात आले. यात महिलांचाही समावेश करण्यात आला आहे.
Read More
२०२३
६
ऑक्टोबर २०२३
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत नक्षलवादविरोधी परिषद
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ६ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘डावी कडवी विचारसरणी क्षेत्रातील सुरक्षा व विकास’ या विषयावर आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते.
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा मेळावा व कुटुंबियांशी संवाद
गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयात आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद, अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत २५ लाख आणि १६ लाख रुपयांचे बक्षिस नावावर असणाऱ्या गिरीधर आणि ललिता या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सरकारच्या वतीने या जोडप्याला पुनर्वसनासाठी २५ लाखांची मदत देण्यात आली. त्याचबरोबर सरकारच्यावतीने नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि पुढील जीवन सन्मानाने जगता यावे यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, तसेच सुरक्षा दलाच्या शिस्त आणि संवेदनशीलतेमुळे गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. सुरक्षा दलाच्या या कामगिरीमुळे मागील ४ वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील एकही तरुण किंवा तरुणी नक्षली चळवळींमध्ये सहभागी झालेली नाही. दरम्यान, जिवावर उदार होऊन नक्षलींचा खात्मा करणाऱ्या सी-६० जवानांचा या कार्यक्रमात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ नक्षलवादी ठार झाले आहेत. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कारवाईबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. पोलिस दलाच्या या अतुलनीय कामगिरीमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत झाली. त्याचबरोबर इथल्या नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत झाली.
नक्षलविरोधी परिषदेत महाराष्ट्रातील १० वर्षांचा आढावा
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ७ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘डावी कडवी विचारसरणी क्षेत्रातील सुरक्षा व विकास’ या विषयावर आढावा बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राने गेल्या १० वर्षांत नक्षलवादाविरोधात कशाप्रकारे कठोर कारवाई केली, याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने कशी केली, याची माहिती देण्यात आली. नक्षलवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने मोठे यश मिळवले. प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे, त्यामुळे या भागात भीती आणि दहशतीवर कशाप्रकारे मात केली. तसेच २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत नक्षलवादाविरोधातील अभियान कसे तीव्र करण्यात आले, याची माहिती दिली गेली. राज्यात सशस्त्र नक्षलवादी कॅडरची संख्या २०१३ मध्ये ५५० होती, ती २०२४ मध्ये अवघी ५६ झाली आहे. गेल्या सहा वर्षात ९६ सशस्त्र नक्षलवादी मारले गेले, १६१ पकडले गेले आणि ७० जणांनी आत्मसमर्पण केले. अबुझमाड ते एमएमसी झोनपर्यंतच्या नक्षलवाद्यांच्या विस्तार योजनेलाही मोठा धक्का बसला आहे. या कार्यकाळात एकाही व्यक्तीची नक्षलवादी संघटनेमध्ये नव्याने भरती झालेली नाही. तसेच सुरक्षा दलाचा सदस्यही शहीद झाला नाही, अशी माहिती परिषदेत देण्यात आली.
उत्तर गडचिरोली नक्षलवादमुक्त; ११ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
डिसेंबर २०२४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोलीला भेट दिली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचा सदस्य तथा सीसीएम भूपती याची पत्नी ताराक्कासह तीन विभागीय समिती सदस्य दर्जाचे वरिष्ठ कॅडर, उपकमांडर, दोन एरिया कमिटी सदस्य व ४ इतर सदस्य अशा ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या सर्वांवर १ कोटी ३ लाख रुपयांचे बक्षीस सरकारने जाहीर केले होते. गडचिरोली पोलिसांच्या या यशामुळे उत्तर गडचिरोली नक्षलवादमुक्त झाला आहे. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलिसांना ५ बसेस, १४ चारचाकी आणि ३० मोटरसायकल आणि हॅलिकॉप्टर हँगरचे लोकार्पण करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कोट्यवधी रुपयांचे बक्षिस असणाऱ्या १२ नक्षलवाद्यांनी गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केले. लोकशाही मुल्यांवरील विश्वास दृढ व्हावा म्हणून आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली. त्याचप्रमाणे या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून त्यांना आर्थिक मदतही देण्यात आली. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये, सपनाक्का चौधरी, रामदास उर्फ चिटकूराम हलामी, शिवलाल उर्फ सुकडू सनकु पदा व पत्नी पुष्पा उर्फ शामबत्ती नागसाय गौरी, कोसा कुंम्मा कोटा, दुर्गी उर्फ रमी चिन्ना वेडकी, अजय उर्फ भीमा सोंगडू मुचाकी, सविता उर्फ सुनिता भीमा नरोटे, अरुणा उर्फ सोनारी येरा तलांकी, दिलीप उर्फ सुधाकर कारु मोहनी तसेच स्वयंचलित एके-४७ व इतर हत्यारांसह संगीता लोहे अत्राम आणि अंजू उर्फ छाया दसरु वड्डे यांनी आत्मसमर्पण केले. दरम्यान, यावेळी आत्मसमर्पण केलेल्या माजी नक्षलवाद्यांपैकी १३ जोडप्यांचा सामूहिक विवाहसोहळा यावेळी पार पडला. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते. त्यांनी या जोडप्यांचे चांगला मार्ग स्वीकारल्याबद्दल अभिनंदन करून, पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सी-६० पथकाच्या कारवाईत ४ जहाल नक्षलवाद्यांचा मृत्यू
गडचिरोली नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोलीतील गट्टा दलममधील नक्षलवादी दबा धरून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सी-६० ची १९ पथके आणि सीआरपीएफ क्यूएटी ची २ पथके जंगलात गस्तीसाठी रवाना करण्यात आली होती. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबारी झाली. यात पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात ४ जहाल नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला. यात १ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश होता. त्याचबरोबर तिथून पोलिसांनी १ एसएलआर रायफल, २ आयएनएसएएस रायफल आणि एक पॉईंट ३०३ रायफल जप्त करण्यात आली.
ज्येष्ठ नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती याने गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुमारे ६० कार्यकर्त्यांसह शस्त्रे सोडून आत्मसमर्पण केले. भूपतीच्या या आत्मसमर्पणामुळे नक्षली चळवळीला मोठा धक्का बसला आहे. आत्मसमर्पण करण्याच्या एक महिना अगोदर भूपतीने अभय या नावाने एक पत्र प्रसिद्ध केले होते. ज्यात नक्षलवादी शांतता चर्चेसाठी आणि शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचे म्हटले होते. मागील चाळीस वर्षांपासून नक्षलवादी संघटनेच्या विस्तारासाठी सक्रिय असलेल्या भूपतीवर विविध राज्यांमध्ये मिळून दहा कोटींपेक्षाही जास्त बक्षीस घोषित करण्यात आले होते. भूपती हा माओवादी पक्षाच्या पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा सदस्य होता. ६९ वर्षांचा भूपती बीकॉमपर्यंत शिक्षित आहे. नक्षलवादी चळवळीतला जहाल नेता, अशी त्याची ओळख होती. तो महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील भागात सक्रिय होता. गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांची जबाबदारी त्याच्याकडे होती.
गडचिरोलीत नक्षल दहशतीची ४४ प्रतिके जमीनदोस्त; सुरक्षा दलांची मोठी कारवाई
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली ४४ स्मारके गडचिरोली पोलीस दल, सी-६० दलातील कमांडो आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त मोहिमेंतर्गत उद्ध्वस्त करण्यात आली. नक्षलवाद्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी आणि दुर्गम भागातील जनतेच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले. या संयुक्त मोहिमेत ८०० जवानांनी नियोजनबद्ध शोध व तपासणी मोहीम राबवली होती. सखोल तपासणीनंतर एटापल्ली, हेडरी, भामरागड, जिमलगट्टा, धानोरा आणि पेंढरी या अतिसंवेदनशील जंगल परिसरातील ४४ स्मारके उद्धवस्त करण्यात आली. राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण आणि ठाम नक्षलविरोधी धोरणामुळे गडचिरोलीतील परिस्थितीत लक्षणीय बदल झाला आहे. सुरक्षा कारवाया, प्रभावी आत्मसमर्पण धोरण, पायाभूत विकास प्रकल्प आणि स्थानिक नागरिकांचा वाढता विश्वास यामुळे जिल्ह्यातील वातावरण सकारात्मक दिशेने बदलत आहे.
सी ६० पथकातील जवानांचा विशेष ‘सी ६० पदक’ देऊन करणार गौरव
नक्षलवाद विरोधातील लढ्यात महाराष्ट्रातील पोलिसांनी निर्णायक यश मिळविले आहे. राज्यातील नक्षलवादाची चळवळ जवळपास संपुष्टात आली आहे. या चळीवळीचे महाराष्ट्रातून नामोनिशाण पुसण्यासाठी मागील काही वर्षात सी ६० पथकातील जवानांनी विशेष योगदान दिले आहे. या पथकाने गडचिरोलीसह दुर्गम भागातील नक्षलवादी कारवाया पूर्णपणे मोडीत काढल्या आहेत. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून सी-६० मध्ये सेवा बजावणाऱ्या सर्व जवानांचा आणि अधिकाऱ्यांचा राज्य सरकारतर्फे विशेष ‘सी-६० पदक’ देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. ३० मार्च) केली.
ऑपरेशन अंतिम प्रहारला मोठे यश; ८ नक्षलवादी अटकेत तर ५ जणांचे आत्मसमर्पण
गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) संयुक्रीत्या राबवलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत ६४ लाखांचे बक्षीस असलेल्या आठ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. तर सुमारे ३८ लाखांचे बक्षीस असलेल्या पाच नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार गडचिरोलीतील सहापैकी ५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. तर त्यातील एका महिला नक्षलवादी मोनी मडावी हिने छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण केले. त्यामुळे या कारवाईनंतर गडचिरोली पोलिसांनी (दि. १६ मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत, नोंदीवर असलेला एकही नक्षवादी शिल्लक राहिलेला नाही, अशी माहिती दिली.
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाच्या हालचाली जवळपास संपुष्टात आल्याचा दावा पोलिसांनी यापूर्वी केला होता. पण उर्वरित नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याऐवजी जंगलात लपून राहणे पसंत केले. परिणामी त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ या नावाने विशेष मोहीम सुरू केली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये फेब्रुवारीमध्ये फोदेवाडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सी-६० जवानाच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग असलेल्या नक्षलवाद्यांचाही समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांनी फोदेवाडा, गुंडेनूर आणि नैताळा जंगल परिसरात मोठा शस्त्रसाठा आणि दारूगोळा लपवून ठेवला होता. तो विशेष शोधमोहिमेत पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यात ५१ अग्निशस्त्रे, २ एलएमजी, ४ एके-४७, ४ एसएलआर, ३ इन्सास रायफल, ३०३ रायफल, बीजीएल लॉन्चर, डिटोनेटर, मॅगझिन आणि शेकडो जिवंत काडतुसे सापडली आहेत. त्याचबरोबर जंगलात लपवून ठेवलेली तब्बल ६५ लाख ३४ हजार रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली. २०२५ मध्ये ऑक्टोबर महिन्यात नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आणि सीपीआयचा (माओवादी) प्रमुख प्रवक्ता मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याच्यासह ६१ माओवाद्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शस्त्रांसह आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर देशभरात १०६३ नक्षलवाद्यांनी ६३७ शस्त्रांसह शरणागती पत्करली आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारने नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अवलंबलेल्या झिरो टॉलरन्स धोरणा अंतर्गत गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून ते नष्ट करण्यात आले. यात सुमारे ५ ते ६ टन वजनाचे १ लेथ मशीन, १५० क्लेमोर व बीजीएल पाईप्स, २२० नग १२-बोअर पाईप्स, २० रायफल रॉड मेटल पट्ट्या तसेच शस्त्र तयार करण्यासाठी वापरले जाणारे इतर साहित्य नष्ट करण्यात आले. या यशस्वी कारवाईबद्दल गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.
नक्षलवादी चळवळ ही सामाजिक अन्याय, आर्थिक विषमता आणि सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष याविरोधात उभी राहिलेली सशस्त्र बंडखोरी सुरुवात झाली होती. नक्षलवादाचा प्रवास हा नक्षलबारी आंदोलनापासून सुरू होऊन महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पसरला. विशेषतः गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या भागांत नक्षली कारवाया अधिक प्रमाणात वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नक्षलवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध सरकारी उपाययोजना, आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजना राबविल्या. गडचिरोली पोलिसांनी सी-६० पथकाच्या माध्यमातून अनेक नक्षलवादी चळवळींवर कठोर कारवाई केली. तसेच नक्षलवाद्यांसाठी शरणागती अभियान राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी प्रयत्न झाले. देवेंद्र फडणवीस सरकारने विकासाच्या माध्यमातून नक्षलवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी आदिवासी विकास योजना, रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात अंतर्गत सुरक्षेला बळकटी देत नक्षलवादविरोधी कारवाईत चांगले यश मिळवले आहे. परिणामी, आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद आता जवळपास संपुष्टात आला आहे. ‘एकतर नक्षलवाद्यांनी शरण यावे, नाही तर त्यांना कंठस्नान घालू’, असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य आता ‘नक्षलवादमुक्त महाराष्ट्र’ या ध्येयाकडे यशस्वीरीत्या वाटचाल करू लागला आहे.