पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात सोमवारी (दि.२९ जून) पुणे विशेष पॉक्सो न्यायालयाने या केसमध्ये ऐतिहासिक निकाल दिला. ६५ वर्षीय नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवत थेट मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. हा खटला महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ मानला गेला आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या ६० दिवसांच्या आत लागलेला हा पहिलाच सर्वात वेगवान आणि ऐतिहासिक निकाल ठरला आहे. न्यायालयाच्या या कठोर निर्णयामुळे पीडित कुटुंबाला आणि समाजाला अत्यंत गतीने न्याय मिळाला आहे. या संपूर्ण प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गृह विभाग आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेली कामगिरी अत्यंत कौतुकास्पद ठरली आहे. गृहमंत्र्यांनी चिमुरडीच्या पालकांना दिलेल्या शब्दाचा मान राखत पुणे पोलिसांनी १५ दिवसांच्या आत १,२०० पानांची चार्जशीट न्यायालयात दाखल केली. विशेष सरकारी वकील ॲड्. अजय मिसर यांनी भक्कम असे पुरावे न्यायालयासमोर मांडले. न्यायालयानेही सुट्ट्यांमध्ये या प्रकरणाची सुनावणी जलद गतीने पूर्ण करून घेऊन नसरापूर अत्याचारातील नराधम आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. या निकालानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये निवेदन करून या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्राला दिली. त्यांनी निकालाबाबत पोलीस प्रशासन, न्याय व्यवस्था आणि वकिलांचे विशेष आभार देखील मानले.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गृह विभाग, पोलीस आणि न्यायालयाने नसरापूर प्रकरणात केलेल्या कामगिरीचा घटनाक्रम.
१ मे २०२६
साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या
उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी आलेल्या चिमुरडीवर ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळे याने अत्याचार करून तिची हत्या केली. घटना उघडकीस येताच परिसरात प्रचंड जनक्षोभ उसळला. पुणे-बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू झाले.
२ मे २०२६
गृहमंत्री आणि पोलिसांकडून कारवाई
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलिसांना तात्काळ तपासाचे व कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे २४ तासांच्या आत आरोपी भीमराव कांबळेला अटक केली.
३ मे २०२६
पीडितेच्या वडिलांना गृहमंत्र्यांचा फोन
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पीडित चिमुरडीच्या वडिलांना फोन करून त्यांचे सांत्वन केले. तसेच आरोपीला मृत्यूदंडाची (फाशीची) शिक्षा मिळवून देऊ आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, असा शब्द दिला. दरम्यान, आरोपीचा गुन्हेगारी इतिहास शोधण्याचे काम पोलिसांनी केले.
५ मे २०२६
विशेष पथक आणि वकिलांची नियुक्ती
गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. हा खटला न्यायालयात भक्कमपणे लढण्यासाठी गृह विभागाने नामांकित कायदेतज्ज्ञ ॲड्. अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली.
१६ मे २०२६
१५ दिवसांत १,२०० पानांचे दोषारोपपत्र दाखल
पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत, डीएनए नमुने, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा केले. गुन्हा घडल्यापासून अवघ्या १५ दिवसांच्या आत पोलिसांनी कोर्टात १,२०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. हे गृह विभाग आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेचे मोठे यश आहे.
२८ मे २०२६
फास्ट ट्रॅक कोर्टात आरोपीवर दोषारोप निश्चित
पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे प्रकरण विशेष पॉक्सो फास्ट-ट्रॅक कोर्टात चालवण्यात आले. सुनावणी सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आली. २८ मे रोजी कोर्टाने आरोपीवर दोषारोप निश्चित केले.
२० जून २०२६
सरकारी वकिलांकडून सर्व पुरावे सादर
विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी ५५ साक्षीदार आणि पोलिसांनी गोळा केलेले सायंटिफिक पुरावे कोर्टासमोर सादर करून गुन्हा ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर’ असल्याचे सिद्ध केले.
२५ जून २०२६
आरोपीच्या खोटेपणाचा पर्दाफाश
अहवाल आणि डीएनए प्रोफाइलिंगच्या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे सरकारी वकिलांनी पुराव्यांचे विश्लेषण करून आरोपीचा खोटेपणा उघडा पाडून त्याच्यावरील दोषारोप सिद्ध करून त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली.

२९ जून २०२६
न्यायालयाकडून आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावणी
१ मे २०१६ रोजी पुण्यातील नसरापूर येथे ६५ वर्षीय भीमराव कांबळे याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस सरकारने एसआयटी स्थापन करून सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ५५ दिवसांत या प्रकरणाची सुनावणी पार पाडून ६० व्या दिवशी कोर्टाने आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा सुनावली.
संबंधित लेख:
