७
मार्च २०२५
मुंबई मेट्रोचे एमएमआरडीएमध्ये ३३७ किमीचे जाळे; २०२७ पर्यंत सर्व लाईन होणार सुरू!
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) क्षेत्रात मुंबई मेट्रोचे जवळपास ३३७ किलोमीटरचे जाळे तयार केले जात आहे. यासाठी १४ लाईन्स ठरवल्या असून त्याच्यासाठी २२५ मेट्रो स्टेशन्स बांधले जात आहेत. सध्याच्या घडीला मुंबई मेट्रोच्या ३ लाईन्स फूल स्वींगमध्ये सुरू आहेत. मेट्रो १ पहिली लाईन वर्सोवा ते घाटकोपर (११.४ किमी), मेट्रो २ मधील टप्पा अ दहिसर पूर्व ते डी एन नगर (१८.६ किमी) आणि मेट्रो ७ दहिसर पूर्व ते गुंदवली (१६.५ किमी) सुरू आहेत. अशी एकूण ४६.५ किमीची मेट्रो मुंबईत सुरू आहे.
२०१४ ते २०१९ या कालावधीत त्यावेळचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी साधारण दहा मेट्रो लाईन्सला परवानगी दिली होती. घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो १ वगळता उर्वरित सर्व लाईन्सना देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच परवानगी देण्यात आली. त्यामुळेच त्यांना मेट्रो मॅन हे विशेषण बरोबर लागू पडते, मेट्रो मॅन देवेंद्र फडणवीस. या ५ वर्षात परवानगी दिलेल्या लाईनपैकी बऱ्याचशा लाई्न्स पूर्ण देखील झाल्या आहेत. काही लाईन्स अंतिम टप्प्यात आहेत; तर काहींचे काम सुरू असून त्या टप्प्याटप्प्याने येत्या दोन-तीन वर्षात पूर्ण होतील, असे दिसते. सध्या काम सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या अशा सर्वच मेट्रो लाईन प्रकल्पांची सद्यस्थिती आपण थोडक्यात जाणून घेऊ. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नुकत्याच झालेल्या २०२५च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली आहे.
मेट्रो २ टप्पा अ ही लाईन १९ जानेवारी २०२३ ला सुरू झाली आहे. तर मेट्रो २ टप्पा ब या मार्गावरील काम सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल आणि ऑक्टोबर २०२६ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.
मेट्रो ३ (कुलाबा ते सीप्झ) या लाईनचे ९५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. याची यशस्वीरीत्या टेस्ट देखील घेण्यात आली आहे. साधारण ३३ किमी असलेला हा देशातील सर्वांत मोठा अंडरग्राऊंड मेट्रो प्रोजेक्ट आहे. जून २०२५ पासून कफ परेड ते सीप्झपर्यंतची मेट्रो सुरू होईल.
मेट्रो ४ (भक्ती पार्क, वडाळा – ठाणे – कासारवडवली) या मार्गाचे एकूण ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन या मार्गावरील मेट्रो डिसेंबर २०२५ मध्ये सुरू होणार आहे. तर कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा मार्ग डिसेंबर २०२६ आणि गांधीनगर ते भक्तीपार्क, वडाळा हा मार्ग नोव्हेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होईल. कासारवडवली ते गायमुख या मार्गाचेही ८८ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२५ पर्यंत हा टप्पा पूर्ण होऊन सुरू होईल.
मेट्रो ५ (कापूरबावडी,ठाणे – भिवंडी – कल्याण) चे काम दोन टप्प्यात सुरू आहे. ठाणे ते भिवंडी या टप्प्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. तर भिवंडी ते कल्याण या टप्प्यावरील ५ किलोमीटरच्या मार्गात लोकांचे पुनर्वसन करावे लागणार होते. त्यामुळे त्याचे काम रखडले होते. त्यावर सरकारने अंडरग्राऊंड मार्ग बनवण्याचा पर्याय काढला आहे. त्याचा अभ्यास सुरू आहे.
मेट्रो ६ (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी-कांजुरमार्ग या लाईनचे ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. ही लाईन डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू होईल, असे सांगण्यात आले.
मेट्रो ७ (गुंदवली ते ओव्हरीपाडा) ही लाईन २०२३ मध्येच सुरू झाली आहे.
मेट्रो ७ अ (दहिसर ते मिरा-भाईंदर) या लाईनचेही ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत ही लाईन सुरू होईल. तर अंधेरी ते मुंबई विमानतळ या लाईनचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होऊन ही लाईन सुरू होईल.
मेट्रो १० (गायमुख ते शिवाजी चौक) या मार्गाचे काम अजून सुरू झालेले नाही. या मार्गाच्या तांत्रिक परवानग्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मेट्रो १२ (कल्याण ते तळोजा) या मार्गाचे आतापर्यंत फक्त ६ टक्के काम झालेले आहे. यामध्ये काही अडचणी आलेल्या आहेत.
अशाप्रकारे एमएमआरडीए रीजनमधील मुंबई मेट्रोचे काम एकदम जोरात सुरू आहे. साधारण २०२५, २०२६ आणि २०२७ या तीन वर्षांत मेट्रोच्या सर्व महत्त्वाच्या लाईन्सचे काम पूर्ण होऊन त्या सुरू होतील. या सर्व लाईन्स सुरू झाल्या की, संपूर्ण मुंबईमध्ये मेट्रोचे एक जाळे निर्माण होणार आहे. मेट्रोने सेंट्रलवरून वेस्टर्नला, वेस्टर्नवरून हार्बर, सेंट्रल आणि मुंबई शहरात अवघ्या १ ते २ तासांत पोहोचता येणार आहे.