समृद्धी महामार्ग

समृद्धी महामार्ग: इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस यांच्या २५ वर्षांच्या स्वप्नाची प्रत्यक्ष पूर्ती

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग पूर्ण: महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा दिवस. कारण आज (गुरूवार दि. ५ जून २०२५) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी (नाशिक) ते आमणे (ठाणे) वाहतुकीसाठी खुला होत आहे. त्यामुळे आता ७०१ किलोमीटर लांबीचा हा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाला असून, त्यासोबतच एक दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचं स्वप्नं प्रत्यक्षात उतरलंय. इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस (Infra Man Devendra Fadnavis) यांनी २५ वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्नं प्रत्यक्ष कागदावर उतरलं २०१५ मध्ये आणि आज बरोबर १० वर्षांनी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग पूर्ण होत आहे.

शेवटचा टप्पा समृद्धी अपडेट: नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशनचा ‘समृद्ध प्रवास’

३१ जुलै २०१५: विधानसभेत नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे ची घोषणा.

१८ डिसेंबर २०१८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन.

२० डिसेंबर २०१९: नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे नामकरण ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’.

११ डिसेंबर २०२२: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी (५२० किमी) टप्प्याचे उद्घाटन.

२६ मे २०२३: शिर्डी ते भरवीर (८० किमी) दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन.

४ मार्च २०२४: भरवीर ते इगतपुरी (२५ किमी) टप्पा वाहतुकीसाठी खुला.

५ जून २०२५: इगतपुरी (नाशिक) ते – आमणे (ठाणे) शेवटच्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन.

नागपूर ते मुंबई स्वप्नांची पेरणी

नागपूर, विदर्भ आणि मराठवाडा हे भाग महाराष्ट्राच्या तुलनेने मागासलेले मानले जात होते. त्यावेळी नागपूरचे आमदार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २००० मध्ये एक कल्पना मनात रूजवली होती. ती म्हणजे, नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना थेट जोडणारा एक वेगवान, सुरक्षित आणि बहुउद्देशीय महामार्ग. हा महामार्ग केवळ दळणवळणाचा नाही, तर संपूर्ण राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक उलाढालीचा हा मार्ग ठरेल, असा ठाम विश्वास इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस यांना होता. विदर्भ आणि मराठवाठ्याचा विकास करायचा असेल तर, या भागातला शेतीचा माल, विविध उत्पादने ही कमीतकमी वेळेत थेट शहरांपर्यंत पोहोचली पाहिजेत. शहरातील तंत्रज्ञान या भागात आले पाहिजे. या भावनेतून हा सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे आकारास येत होता.

संधी आणि संकल्पाची पूर्तता

देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २००० मध्ये पाहिलेले नागपूर ते मंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे चं स्वप्नं हे दोन्ही अर्थाने २०१४ मध्ये खरे ठरले. एकतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक १२२ आमदार निवडून आले आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी या स्वप्नाच्या दिशेने प्रत्यक्ष पावले उचलली. ३१ जुलै २०१५ रोजी विधिमंडळात ‘नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे’ची घोषणा झाली. त्यानंतर ‘पुलिंग मॉडेल’ अंतर्गत रेकॉर्ड वेळेत भूसंपादन पूर्ण करण्यात आले. जमिन अधिग्रहण करण्यासाठी २०१३ च्या भूसंपादन कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. शेतकऱ्यांना बाजारभावानुसार मोबदला दिला. काहींना विकसित जमीन, तर काहींना रेडी रेकनर दरानुसार थेट फायद्याची हमी देण्यात आली. प्रकल्पाची प्रशासकीय किंमत काढण्यात आली. जून २०१८ मधील पहिल्या प्रशासकीय किमतीनुसार या प्रकल्पासाठी ४९,२४७ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. पण निविदा प्रक्रियेनंतर प्रकल्पाच्या खर्चाचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला आणि ऑक्टोबर २०१८ प्रकल्पाची सुधारित किंमत ५५,३३५.३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आली. याचे बांधकाम सुरू करण्यासाठी १६ पॅकेजेस तयार करण्यात आली. या पॅकेजेसचे काम करण्यासाठी १३ नामांकित कंपन्यांची निवड करण्यात आली. अशाप्रकारे मागील १० वर्षात विविध प्रकारच्या अडचणींवर मात करत, सर्वांना विचारात घेऊन या प्रकल्पातील अडथळे दूर केले. त्यानंतर साधारण तीन टप्प्यात हा मार्ग लोकांसाठी खुला केला. आता चौथ्या टप्प्यातील नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग पूर्ण मार्ग खुला झाला की, एका स्वप्नाची पूर्तता होणार आहे.

समृद्धी महामार्ग – इकॉनॉमिक कॉरिडोर अन् विकासाचा महामार्ग

समृद्धी महामार्ग हा फक्त एक रस्ता नाही, तर राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २४ जिल्ह्यांमधील नागरिकांना आपली प्रगती साधण्याची संधी देणारा मार्ग आहे. विकासाशी जोडणारा दळणवळणाचा हा सुपर एक्सप्रेस-वे आहे. हा जरी इतर महामार्गांप्रमाणेच असला तरी, याचे सौंदर्य निराळेच आहे. या महामार्गात ८ बोगदे, ३६ टोल नाके, ४०० हून अधिक लहान-मोठे पूल आणि उड्डाणपूल आहेत. नागपूरच्या मिहान प्रकल्पापासून मुंबईच्या बंदरापर्यंत थेट संपर्क साधणारा हा राजमार्ग आहे. शेतकऱ्यांसाठी थेट बाजारपेठ, कृषी समृद्धी केंद्रे, नवीन औद्योगिक वसाहती आणि स्थलांतर थांबवण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती, हे सर्व या महामार्गाच्या माध्यमातून शक्य होत आहे. यात टप्प्याटप्प्याने आणखी काही नवीन गोष्टींची भर पडत आहे. या महामार्गाने आजचा महाराष्ट्र भविष्यातील जागतिक महाराष्ट्राकडे वाटचाल करत आहे.

समृद्धी महामार्गाच्या निर्मितीमागे असलेली दूरदृष्टी आणि त्याचे मॅनेजमेंट ही देवेंद्र फडणवीस यांची ओळख बनली आहे. ‘इन्फ्रा मॅन’ ही उपाधी यामुळेच त्यांना सार्थ ठरते. एका स्वप्नाला आकार देण्यासाठी त्यांनी घेतलेली धडपड, स्वीकारलेली आव्हाने आणि त्यातून आकारास आलेला प्रकल्प आज महाराष्ट्राच्या नकाशावर अमिट ठसा उमटवत आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आज पूर्ण झाला. पण महाराष्ट्राच्या भरभराटीची सुरुवात मात्र यानंतरच खऱ्या अर्थाने सुरु होईल. देवेंद्र फडणवीस यांचे २५ वर्षांपूर्वीचे स्वप्नं, हे आता महाराष्ट्राच्या उन्नतीचा मार्ग बनला आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *