नाशिक कुंभमेळा २०२७ ची तयारी पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नियोजन कौशल्य दिसून येते. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि आयोजन नेटके व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून हा सिंहस्थ कुंभ मेळा ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, असा संकल्प त्यांनी सोडला आहे. नुकताच प्रयागराज येथील सिंहस्थ कुंभ मेळा पार पडला. या कुंभ मेळ्यात देश-विदेशातील कोट्यवधी भाविक सहभागी झाले होते. त्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने जवळपास ७,५०० हेक्टर जागेवर कुंभ मेळ्याचे नियोजन केले होते. तसेच कुंभ मेळ्याचे नियोजन नेटके पार पडावे यासाठी कुंभमेळा कायदा आणि कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कायदा आणि प्राधिकरण तयार करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
नाशिक कुंभमेळ्याचे महत्त्व!
भारतात दर तीन वर्षांनी एकदा असे बारा वर्षांत नाशिक (त्र्यंबकेश्वर), प्रयागराज, उज्जैन आणि हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. कुंभमेळा हा हिंदु धर्मियांचा धार्मिक उत्सव आहे. या सोहळ्यात कोट्यवधी भाविक उत्साहाने सहभागी होतात. कुंभमेळ्यात शाही स्नानाला विशेष महत्त्व आहे. नदीमध्ये स्नान करून सुर्याला अर्घ्य देत नदीची पूजा केली जाते. वेगवेगळ्या आखाड्याचे साधू महंत मिरवणूक काढत कुंभमेळा दरम्यान शाही स्नान करतात.
त्र्यंबकेश्वर कुंभमेळा ठरणार ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ!’
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रासह देश-विदेशातून लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनाबरोबरच, गर्दीचे व्यवस्थापन, रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुकीचे नियोजन आणि या सर्वावर नजर ठेवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence-AI) वापर केला जाणार आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि तिचे टप्प्याटप्प्याने नियोजन करण्यासाठी ठिकठिकाणी कुंभ मेळाव्याचे डिजिटल प्रदर्शन देखील भरवण्यात येणार आहे.
दळणवळणाच्या सोयीसुविधांवर विशेष भर
सिंहस्थसाठी कुंभमेळाव्यासाठी मुंबई, जव्हार (ठाणे), गुजरात, छत्रपती संभाजी नगर, शिर्डी, धुळे, पुणे, मुंबई अशा विविध मार्गांनी भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने रस्त्यांचे बळकटीकरण आणि वाहनतळांची सुविधा निर्माण केली जाणार आहे. कुंभमेळाव्याच्या काळात नाशिक शहरात गाड्या घेऊन जाण्यावर बंदी घालण्याचा विचार ही प्रशासन करत आहे. यासाठी ठिकठिकाणी वाहनतळ आणि शहरातील प्रवासासाठी ई-बसचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच शिर्डी, छत्रपती संभाजी नगर, ओझर या विमानतळावर प्रवाशांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शिर्डी विमानतळावर विमाने थांबविण्यासाठीची जास्तीची जागा निर्माण करण्यात येणार आहे. ओझर विमानतळावरही जास्तीच्या विमानांच्या लँडिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर नाशिक शहरात हेलिपॅड उभारण्याचा विचार ही प्रशासन करत आहे.
कुंभ मेळाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कॉरिडॉर निर्माण करणार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेला भाविक हा जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर, शिर्डी, वणी, शनि शिंगणापूर, मांगीतुंगी अशा धार्मिक स्थळांनाही आर्वजून भेट देतो. त्यासाठी या धार्मिक स्थळांचे कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. त्यादृष्टिने जवळच्या मंदिरांचे नुतनीकरण आणि तिथल्य सोयीसुविधांमध्ये वाढ केली जाणार आहे. नाशिकमधील राम काल पथाचे काम पुढील वर्षीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घेतले जाणार आहे. कुशावर्तासह इतर कुंडांच्या सौंदर्यीकरणाचे कामही केले जाणार आहे.
त्र्यंबकेश्वरसाठी ११०० कोटी रुपयांचा विकास आराखडा
कुंभमेळ्यासाठी नगरपालिकेने त्र्यंबकेश्वर विकास आराखडा तयार केला असून, हा आराखडा ११०० कोटी रुपयांचा आहे. आराखड्यात या स्थानाचे अध्यात्मिक आणि पर्यटनाच्यादृष्टिने महत्त्व लक्षात घेऊन विकासकामे प्रस्तावित केली आहेत. राज्य सरकारने साधारण दोन महिन्यापूर्वी त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. तसेच तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत त्र्यंबकेश्वरसाठी २७७ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर दर्शन मार्गासाठी ६८ कोटी, त्र्यंबकेश्वरमधील नवीन रस्त्यांसाठी १८२ कोटी, व्यापारी संकुल आणि वाहनतळांसाठी १५ कोटी आणि सार्वजनिक शौचालयांसाठी १२ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेले निर्णय
- नाशिकजवळ महाकुंभ उभारून देशातील धार्मिक परंपरा, मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन घडवण्यासाठी भव्य कन्व्हेंशन सेंटर उभारणे.
- नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे प्रभावी ब्रँडिंग करणे.
- भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था व गर्दी नियोजन सुटसुटीत ठेवण्यासाठी उपाययोजना करणे. शहरातील अतिक्रमणे तात्काळ हटवणे.
- साधुग्रामसाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन करणे. तसेच नगररचना परियोजन करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करून ते नगरपालिकेकडे हस्तांतरीत करणे.
- देशविदेशातून येणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी नाशिक येथे ८ ते १० हेलिपॅड्स उभारणे. समृद्धी महामार्गाद्वारे नाशिकला जोडणाऱ्या मार्गांचे काम पूर्ण करून, इगतपुरी ते नाशिक हा मार्ग अधिक प्रशस्त करणे.
- गोदावरी नदीसह सर्व उपनद्यांचे शुद्धीकरण करणे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत दूरदृष्टीपूर्ण आहे. ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ ही संकल्पना या पारंपरिक आणि आध्यात्मिक सोहळ्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारी ठरेल. प्रयागराज कुंभमेळ्यातील यशस्वी नियोजनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, स्वतंत्र कायदा आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून नियोजन अधिक कार्यक्षम आणि सुव्यवस्थित करण्याचा सरकारचा विचार स्वागतार्ह आहे. हे पाऊल नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याला जागतिक पातळीवर नव्याने ओळख मिळवून देणारे ठरेल, तसेच भाविकांच्या सुरक्षितता, सुविधा आणि श्रद्धेचा सन्मान राखणारे ठरेल.
संबंधित लेख: