मानवगाथा | गडचिरोली

महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस: माणूसपणाची भावना जागवणारे मुख्यमंत्री!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच गडचिरोलीतील विकास दौरा झाला. ते प्रशासनाचे प्रमुख म्हणून फक्त कायदे-कानून आणि योजना राबवणारे नेते नाहीत. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे माणूसपण जपण्याची भावना दिसून येते. नुकताच त्यांचा गडचिरोली जिल्ह्याचा दौरा झाला. या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वागण्या-बोलण्यातून आणि कृतीतून मानवतावादी दृष्टिकोनाचे दर्शन झाले. त्यांच्या या कृतीमुळे गडचिरोलीतील नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण दिसून आले. इथले आदिवासी कधी गावच्या तलाठ्याशी समोरासमोर बसून बोलले नव्हते. त्या आदिवासींशी राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या घोळक्यात बसून गप्पा मारत होते. या गप्पा, विचारपूस आदिवासींमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करणाऱ्या आहेत. आतापर्यंत त्यांच्याशी राज्याच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याने असा थेट संवाद साधला नव्हता. हाच आपलेपणा देवेंद्र फडणवीस यांना वेगळे ठरवतो.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच ६ जून रोजी गडचिरोलीचा दौरा केला. यापूर्वी त्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२५ रोजी गडचिरोलीचा दौरा केला होता. या दोन्ही दौऱ्या दरम्यान त्यांनी गडचिरोलीतील विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन केले. त्याचबरोबर आत्मसमर्पण केलेल्या नक्षली युवक-युवतींशी संवाद साधून त्यांना पुन्हा एकदा आपल्यात सामावून घेतले. या प्रशासकीय गोष्टी वगळता देवेंद्रजींनी इथल्या लोकांमध्ये मिसळून त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण केली. त्यांच्या आशा-आकांक्षा, मागण्या याविषयी चर्चा केली. सरकारने एखादी योजना समाजाला दिली की, सरकारची भूमिका तिथे संपते. पण देवेंद्रजींनी इथे तसे केले नाही. सरकार हे लोकांचेच आहे. त्यांच्यासाठी विकासात्मक योजना राबवणे हे सरकारचे कामच आहे. पण त्याही पलिकडे जाऊन त्यांच्या आनंदात सहभागी होणे, त्यांच्या परंपरांचा सन्मान करणे, त्यात सहभागी होणे. त्यांच्यात उठणे-बसणे या गोष्टी आपल्याशा वाटणाऱ्या आहेत. तसेच नक्षलींचे आत्मसमर्पण ही तशी प्रशासनिक आणि पोलिसांच्या नियमित कामकाजातील एक नेहमीची गोष्ट वाटू शकते. पण त्याही पलिकडे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आत्मसमर्पण केलेल्या तरुण-तरुणींना भेटले. त्यांना इथून पुढे सन्मानाचे जीवन जगता येईल, असा विश्वास दिला. तर काही आत्मसमर्पित तरुण-तरुणींच्या लग्नसोहळ्यात सहभागी होऊन त्यांच्या सुखी संसाराच्या वाटचालीत आम्ही सर्वार्थाने सहभागी आहोत, असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करण्याचे काम त्यांनी केले.

स्थानिकांमध्ये सुरक्षिततेची तर पोलिसांमध्ये आत्मविश्वासाची भावना

देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोलीचा दौरा सर्वार्थाने खूप महत्त्वाचा ठरला. कारण या दौऱ्याच्या काही दिवसांपूर्वीच नक्षली चळवळीतील दोन मोठ्या नेत्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यांच्यावर सरकारने लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा गडचिरोली दौरा सोपा नव्हता. पण लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा गडचिरोलीचा दौरा खेळीमेळीने पूर्ण केला. अत्यंत संवेदनशील आणि नक्षलींचा गड अशी ओळख असलेल्या कवंडे गावाला भेट देऊन तिथल्या लोकांमध्ये सहभागी होऊन त्यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. तर अनेक लाभार्थ्यांना सरकारी योजनांचे वाटप केले. हे धाडस आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्याने दाखवलेले नाही. यातून गडचिरोलीतील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पोलिसांनी, तसेच सैन्यातील सी-६० दलाच्या जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावून इथे जी शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्याचे चांगले परिणाम मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून दिसून आले. एकाचवेळी स्थानिकांमध्ये विश्वासार्हता आणि आपल्या पोलिसांच्या कार्यपद्धतीवर विश्वास दिसून आला.

आदिवासी समाजाच्या भावनांचा सन्मान…

मुख्यमंत्र्याचे एका कार्यक्रमात स्वागत करताना त्यांना आदिवासींचा पारंपरिक मुकुट घालण्यात आला. हा मुकूट मुख्यमंत्र्यांनी अत्यंत विनम्रपणे परिधान करून आदिवासींच्या परंपरांचा सन्मान केला. साधारणत: राजकीय नेते अशा गोष्टींचा फायदाच घेत असल्याचे आपण पाहतो. पण देवेंद्रजी अशा गोष्टींना नेहमीच अपवाद असल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी देवेंद्रजींना एका कार्यक्रमात महाराजांचा जिरेटोप घालण्यात येत होता. त्यावेळी देवेंद्रजींनी अत्यंत नम्रपणे आपल्या पायातील बूट काढून तो जिरेटोप हातात स्वीकारला. तर इथे गडचिरोलीत त्या चिमुकलीने घातलेला आदिवासी परंपरेतील टोप अत्यंत प्रेमाने परिधान केला. या कृतीतून त्यांनी संपूर्ण आदिवासी समाजाच्या प्रेमाचा स्वीकार केला.

अशाच पद्धतीने देवेंद्रजींनी कार्यक्रमाचा स्टेज सोडून लोकांमध्ये बसून त्यांच्याशी गप्पा मारण्याला प्राधान्य दिले. यातूनही देवेंद्रजींचा सहजपणा दिसून येतो. अन्यथा अशा संवेदनशील भागात थेट लोकांमध्ये जाऊन खाली बसण्याचे धाडस सहसा कोणी दाखवत नाही. हा एक आपलेपणाचा संदेश होता. मी तुमच्यातीलच एक आहे; ही भावना जागृत करणारा हा प्रसंग होता. यावेळी देवेंद्रजींनी एका आदिवासी मुलीशी संवाद साधून तिला शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच तिच्यासाठी खास सायकल देणार असल्याचेही त्यांनी तिला सांगितले. देवेंद्रजींनी २०१४ पासून नेहमीच गडचिरोलीला आपले मानले आहे. त्यावेळीही त्यांनी गडचिरोलीचे बरेच दौरे केले होते. आताही पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे गडचिरोलीतील दौरे सुरू झाले आहेत. गडचिरोलीतील प्रत्येक भागात फिरलेले ते एकमेव मुख्यमंत्री आहेत. देवेंद्रजींच्या या कृतीमुळे गडचिरोलीतील सर्वसामान्यांचे आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांचे मनोबल वाढले आहे. गडचिरोली बदलतंय, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण होऊ लागला आहे. प्रशासकीय निर्णयाबरोबरच देवेंद्रजींचा मानवतावादी दृष्टिकोन हा येणाऱ्या काळात नक्कीच गडचिरोलीला महाराष्ट्राचा पहिला जिल्हा म्हणून नावारूपास आणण्यास मदतीचा ठरणार आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *