अकोला हा विदर्भातील एक महत्त्वाचा भाग असून, या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी २०१४ नंतर अनेक महत्त्वपूर्ण योजना आणि प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि केंद्र सरकारच्या पुढाकाराने अकोला जिल्ह्यामध्ये जलसिंचन, पायाभूत सुविधा, न्याय व्यवस्था, कृषी व पशुसंवर्धन, तसेच ऊर्जाक्षेत्रात भरीव कामगिरी होत आहे. पूर्णा बॅरेज (तेल्हारा) आणि कारंजा रमजानपूर प्रकल्पांसाठी अनुक्रमे ८८८ कोटी व २११ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, ‘बळीराजा जल संजीवनी योजने’ अंतर्गत अकोल्यातील सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल १८२० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तसेच, गांधीग्राम येथील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी ११११ कोटींची तरतूद करण्यात आली. ऊर्जा क्षेत्रातही जिल्ह्याला बळकटी देताना, ‘महाराष्ट्र सौर कृषी वाहिनी योजना २.०’ अंतर्गत ८,८०० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. न्यायिक सुविधांच्या विस्ताराचा भाग म्हणून अकोट आणि तेल्हाला तालुक्यासाठी अकोटमध्ये वरिष्ठ दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस (Maharashtra Sevak Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या या सर्व प्रकल्पांमुळे अकोला जिल्हा सामाजिक, आर्थिक आणि कृषी विकासाच्या दृष्टीने नवसंजीवनीकडे वाटचाल करत आहे.
अकोल्यातील विविध २१ कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच (दि. ११ जून) अकोला जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक रुपयांच्या (२६१८.५५ कोटी रुपये) निधीचे भूमिपूजन व लोकार्पण केले. सिंचन, रस्ते, रुग्णालाय सुधारणा, सांस्कृतिक भवन, जलतरण तलाव, प्रशासकीय इमारत अशा विविध विभागांशी संबंधित जवळपास २१ विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. ४५४.६२ कोटी रुपये खर्च करून इथे सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यात आली. तसेच अकोल्यामध्ये बांधण्यात येणाऱ्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीच्या कोनशिलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीसाठी २४९.४१ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
पूर्णा बॅरेजसाठी ८८८ कोटी तर कारंजा रमजानपूर प्रकल्पासाठी २११ कोटी मंजूर
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील पूर्ण बॅरेज-२ (नेरधामणा) प्रकल्पासाठी ८८८.८१ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १८ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. या प्रकल्पाचा अकोला जिल्ह्यातील ६९५४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तर अकोला तालुक्यातील १८, बाळापूर तालुक्यातील ५, अकोट तालुक्यातील २ आणि तेल्हाऱ्यातील ७ गावे अशी एकूण ३२ गावांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर अकोल्यातील खारपाण पट्ट्यातील कारंजा रमजानपूर लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या २११ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. या प्रकल्पामुळे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ६ गावातील १७९० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पावर जून २०१७ मध्ये ९२.६८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, उर्वरित कामे जून २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवून याला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मंजूर झालेल्या २११.१५ कोटी रुपयांपैकी प्रत्यक्ष कामासाठी ११९.९२ कोटी आणि अनुषंगिक खर्चासाठी ११.२३ कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले होते.
बळीराजा जल संजीवनी योजनेतून अकोल्यासाठी १८२० कोटींचा निधी
अकोला जिल्हा विकास – केंद्र सरकार पुरस्कृत बळीराजा जल संजीवनी योजनेत अकोला जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांचा समावेश करून त्यांच्या विकासासाठी १८२० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी समन्वय साधून या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून घेतला. मध्ये प्रकल्पांमध्ये पूर्णा बॅरेज-२ (१९० कोटी), उमा बॅरेज प्रकल्प (५१६ कोटी), घुगंशी बॅरेज (१९५ कोटी), काटेपूर्णा बॅरेज (२३५ कोटी) यांचा समावेश आहे. तर लघु प्रकल्पांमध्ये वाई संग्राहक (४३ कोटी), शहापूर बृहत (१४ कोटी), शहापूर (१२ कोटी), नया अंदुरा संग्राहक (१०७ कोटी), कवठा बॅरेज (१५३ कोटी), पोपटखेड-२ (२५ कोटी) आणि काटीपाटी बॅरेजसाठी (३३० कोटी) इतका निधी देण्यात आला. या प्रकल्पांतून अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, मूर्तिजापूर, अकोट, बाळापूर आणि अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
गांधीग्राममधील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी ११११ कोटींचा निधी
अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे काम केंद्र सरकारने हाती घेतले. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने अकोला ते महान, अकोला ते अकोट, शेगाव ते देवरी आणि अकोट ते अंजनगाव या मार्गावर दोन लेनचा महामार्ग बांधण्यासाठी ११११.७२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
जिल्ह्यातील ८,८०० शेतकऱ्यांना दिवसा वीज
महाराष्ट्र सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अकोल्यामध्ये ३१ मेगावॅट क्षमतेचे एकूण ९ सौर प्रकल्प सुरू करण्यात आले. त्यामुळे यातून निर्माण होणाऱ्या विजेचा साधारण ८,८०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या शेतकऱ्यांना आता दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी दिवसा आणि बिन खंड पडता वीज उपलब्ध व्हावी. यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सौर प्रकल्पातून २०४ मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. त्यामुळे सरकारच्या योजनेप्रमाणे इथल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा आणि भरवशाची वीज मिळत आहे. अकोल्यातील जलालाबाद (३), रेडवा (२), माना (२), पांगरा (३), चान्नी (५), टाकळी निमकर्दा (४), माझोड (५), कवठा खुर्द (३) आणि वांगरगाव (४) येथील केंद् कार्यान्वित झाले आहेत.
अकोटमध्ये वरिष्ठ दिवाणी न्यायालयाची स्थापना
अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा या तालुक्यांसाठी दिवाणी न्यायालय स्थापन करण्याबाबात आणि त्यासाठी लागणारी आवश्यक पदे निर्माण करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला सांगितले होते. त्यानुसार देवेंद्र फडणवीस सरकारने ८ मे २०१८ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन्ही तालुक्यांसाठी अकोट येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक पदांची निर्मिती करण्यास मंजुरी दिली होती. फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे दोन्ही तालुक्यातील नागरिकांची सोय होऊन तिथली न्यायदानाची प्रक्रिया लोकाभिमुख आणि अधिक वेगवान होण्यास मदत झाली.
उन्नत शेती समृद्ध अभियानातून शेतकऱ्यांना मदत
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरणासाठी २०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. या उन्नत शेती समृद्ध अभियानातून शेतकऱ्यांना अनुदानावर ट्रॅक्टर खरेदीसाठी ८० कोटी रुपये तर शेतीतील यंत्रे आणि अवजार खरेदीसाठी १२० कोटी रुपयांची तरतूद केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना माती परीक्षण करून देणे, गटशेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे यावर भर दिला. या अशा योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना सरकार मदतीचा हात देत आहे. अकोला जिल्ह्यातील काटीवाटी येथील सत्यदेव सखाराम चऱ्हाटे यांना उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानाच्या माध्यमातून ट्रॅक्टर देण्यात आला. लकी ड्रॉच्या माध्यमातून सत्यदेव चऱ्हाटे यांचा क्रमांक लागला आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी त्यांच्या खात्यात १ लाख २५ हजार रुपये जमा झाले. या ट्रॅक्टरमुळे चऱ्हाटे यांना शेतीच्या कामात मोठी मदत होत आहे.
अकोल्यातील शहरांचा कायापालट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार स्वच्छ, सुंदर व स्मार्ट शहरांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. या वचनबद्धतेची पूर्तता करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यासाठी ३९४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यात अकोला शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी अमृत योजनेतून १६० कोटी, शहरातील मलनिस्सारण प्रकल्पासाठी अमृत योजनेतून ११३ कोटी, जिल्ह्यातील नागरी रस्त्यांच्या विकासासाठी २२ कोटी, तसेच नागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी ८७ कोटी, त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानासाठी १२ कोटी रुपये आणि अकोला महानगरपालिकेची हद्दवाढ मंजूर करण्यास फडणवीस सरकारने अकोला विकास निधी मंजुरी दिली.
अकोल्यात नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय
अकोल्यात नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय महायुती सरकारने १६ मे २०२३ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या ५६ शिक्षक, ४८ शिक्षकेतर संवर्ग अशी एकूण १०४ पदे तसेच बाहेरून भरण्यात येणारी ६० पदे अशा १६४ पदांना मान्यता देण्यात आली. याची अंमलबजावणी करण्यासाठी ३१६ कोटी ६५ लाख रुपयांच्या खर्चासही राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
अकोला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने विविध क्षेत्रांत भरीव निधी मंजूर केला आहे. कृषी योजनांमधून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची मदत होत आहे. तसेच, अकोल्यातील शहरांचा कायापालट होत आहे. राज्य सरकारने राबवलेल्या सर्व प्रकल्पांमुळे अकोल्याच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला चालना मिळत आहे.