अमरावती

अमरावती जिल्हा विकास: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निर्णायक कामांची मांदियाळी

अमरावती जिल्हा हा नागपूरनंतर विदर्भातील दुसरा सर्वांत महत्त्वाचा जिल्हा आहे. पण अमरावतीची एवढीच ओळख नाही. तर आता सिंचन व बळीराजा जलसंजीवनी योजना, अमरावती विमानतळ, टेक्सटाईल पार्क, क्रीडा, शिक्षण अशा विविध क्षेत्रामध्ये विकासाचे प्रतीक बनू लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यात मागील काही वर्षांत विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना देण्यात आली. २०१४ पासून सुरू झालेल्या या विकासप्रक्रियेत सिंचन प्रकल्पांपासून ते विमानतळ विस्तार, पोलिसांसाठी आधुनिक घरे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान, क्रीडा व शिक्षणासाठी पायाभूत सुविधा अशा अनेक क्षेत्रांतील कामांचा समावेश आहे. या सर्व कामांमुळे अमरावतीचा सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक चेहरा बदलू लागला आहे.

अमरावतीत विकसित होतंय टेक्सटाईल इकोसिस्टम

अमरावती जिल्ह्याने उद्योगाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पूर्वी या भागात कोणतीही मोठी इंडस्ट्री काम करण्यास उत्सूक नव्हती. पण आता येथे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून ‘टेक्सटाईल झोन’ची स्थापना झाली. त्यामुळे इथली परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. या टेक्सटाईल झोनमध्ये प्रचंड मागणी वाढली आहे. त्यामुळे आता एकही मोकळा प्लॉट उपलब्ध नाही. परिणामी सरकारला जास्तीची जमीन अधिग्रहित करावी लागली. त्यामुळे हे क्षेत्र आता फक्त कापसाच्या शेतीपुरते मर्यादित न राहता, कापसापासून अंतिम उत्पादन म्हणजेच फॅशनपर्यंतच्या सर्व गोष्टींची निर्मिती करणारे भव्य ‘टेक्सटाईल इकोसिस्टम’ बनले आहे.

याच पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने घोषित केलेल्या ७ ‘पीएम मेगा टेक्सटाईल पार्क’पैकी एक टेक्सटाईल पार्क अमरावतीला द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांकडे केली होती. त्यानुसार अमरावतीला पीएम मेगा टेक्सटाईल पार्क देण्यात आले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या उपक्रमामुळे अमरावतीमध्ये सुमारे २ लाख लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, अमरावती जिल्हा महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर ठळकपणे अधोरेखित होईल.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ८३२ कोटींचे सानुग्रह अनुदान

२००६ ते २०१३ दरम्यान सिंचन प्रकल्पासाठी आपली जमीन देणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५ लाख रुपये या दराने एकूण ८३२ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले. २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी हे अनुदान लगेच देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात सानुग्रह अनुदानाचा चेक देण्यात आला. यामुळे विदर्भासह अमरावतीतील हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला.

बळीराजा जलसंजीवनी योजनेतून २५,००० कोटींचा सिंचन प्रकल्प निधी

विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मागील कार्यकाळात ‘बळीराजा जलसंजीवनी योजना’ राबवली होती. या योजनेतून अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील ७९ प्रकल्पांसाठी २५,००० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्याचबरोबर अमरावतीतील ५ मध्यम आणि १९ लघु सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यासाठी २८०२ कोटींचा निधी देण्यात आला होता. तसेच वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड येथे ८० कोटी रुपयांचा सोलर पॉवर प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला होता.

बेलोरा विमानतळाचा विस्तार आणि उद्घाटन

अमरावतीच्या भौगोलिक आणि आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा बेलोरा विमानतळ आता विस्तारित आणि आधुनिक स्वरूपात लोकांसमोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मागील कार्यकाळात या विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण, अंतर्गत टॅक्सी-वे, अ‍ॅप्रन, नवीन रस्ते बांधकाम, तसेच जाळू ते निंभोरा दरम्यानचा रस्ता आदी कामांसाठी ३६०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले होते. विशेष म्हणजे, ही सर्व कामे मार्गी लागून एप्रिल २०२५ मध्ये बेलोरा विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या विमानतळामुळे अमरावतीच्या भविष्यातील दळणवळणासाठी एक भक्कम पायाभूत सुविधा उपलब्ध झाली आहे. या विमानतळामुळे औद्योगिक गुंतवणूक, पर्यटन, आणि व्यापारी संधींना अधिक गती मिळेल.

पोलीस प्रशासनासाठी आधुनिक निवास आणि प्रशासकीय सुविधा

२०१९ मध्ये सुरू झालेल्या प्रकल्पांतर्गत अमरावती ग्रामीण पोलीस प्रशासनाची नवीन प्रशासकीय इमारत आणि २०८ आधुनिक फ्लॅट्सचे बांधकाम करण्यात आले. एप्रिल २०२५ मध्ये याचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पाचे देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये भूमिपूजन केले होते. देवेंद्रजींनी पोलिसांसाठी ‘डिजीलोन’सारख्या योजना सुरू करून त्यांना स्वत:च्या मालकीची घरे घेण्याची संधीही उपलब्ध करून दिली आहे.

शिक्षण व क्रीडा क्षेत्रासाठी ‘प्रधानमंत्री उषा’ योजनेअंतर्गत १३ कोटींची तरतूद

संत गाडगेबाबा विद्यापीठात आधुनिक बहुउद्देशीय सभागृह आणि इनडोअर क्रीडा संकुलासाठी १३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, संघभावना आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढीस लागण्यास मदत होईल. विविध इनडोअर खेळांसाठी सुविधा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरणारे हे संकुल विद्यापीठाच्या विकासाचा नवा टप्पा ठरेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने अमरावती जिल्ह्यातील विकासाच्या वाटचालीला नवे वळण मिळाले आहे. ग्रामीण भागातील सिंचन सुविधा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, शहरातील वाहतूक, विमानतळ विकास, पोलिसांचे जीवनमान, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षण व क्रीडासुविधा या सर्व बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून अमरावती जिल्ह्याला सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप मिळाला आहे. या प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अमरावती वेगाने वाटचाल करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *