वातावरणातील लहरीपणामुळे मागील काही वर्षांपासून पावसाचे टाईमटेबल बदलले आहे. अनेकवळा मान्सूनचे आगमन उशिरा होते किंवा कधी खूपच लवकर होते. पण त्याचा महाराष्ट्राभर विस्तार होण्यापूर्वीच त्यात खंड पडतो. त्याचबरोबर अवकाळी पाऊस असेल किंवा गारपीट अशा नाना प्रकारच्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. परिणामी शेतीच्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत होती. अनेक शेतकरी आत्महत्त्येचे टोकाचे पाऊल उचलत होते. या अशा गंभीर परिस्थितीतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी आणि शेतीच्या बाबतीत त्यांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात हवामान अनुकूल कृषी प्रकल्प (Project on Climate Resilient Agriculture) या नावाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कृषी योजना राबविण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने जुलै २०१६ मध्ये घेतला होता. याच योजनेचे १७ जानेवारी २०१७ मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Project) असे नामकरण करण्यात आले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतीसाठी एक महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हवामान बदलांना तोंड देण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये निर्माण करणे. तसेच शेतीमधून अधिकाधिक नफा मिळवून शेतकरी आणि शेतीची पद्धती सक्षम करणे हा आहे. या योजनेतून, हवामानाला अनुकूल शेती पद्धती, जल व्यवस्थापन आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ही योजना राज्य सरकार जागतिक बँकेच्या (World Bank) अर्थसहाय्याने राबवत आहे. यासाठी वर्ल्ड बँकेने ४ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण निधीपैकी ७० टक्के निधी हा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून तर उर्वरित ३० टक्के निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला जात आहे.
कोण आहेत नानाजी देशमुख!
नानाजी देशमुख यांचे मूळ नाव चंडिकादास अमृतराव देशमुख असे होते. त्यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावात ११ ऑक्टोबर १९१६ मध्ये झाला होता. तर २७ फेब्रुवारी २०१० मध्ये त्यांचे निधन झाले होते. नानाजींनी शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि इतर सामाजिक क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कामांमुळे त्यांना २०१९ मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले होते. २०१७ मध्ये राज्य सरकारने नानाजी देशमुख यांची जन्मशताब्दी साजरी केली होती.
नानाजी देशमुख यांनी सुरूवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम केले होते. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले. त्यातूनच पुढे जनसंघाची स्थापना झाली. आणीबाणीनंतरच्या काळात १९७७ मध्ये नानाजी लोकसभेचे सदस्य होते. तर १९९९ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली. राजकारणाबरोबरच त्यांनी सामाजिक कार्यातून शेती क्षेत्रात मोठे काम निर्माण केले. दीनदयाळ शोध संस्थेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था निर्माण केली. ४० हजार कूपनलिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत केली. चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले. १९९० च्या दशकात त्यांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील सुमारे २५० गावे दत्तक घेऊन त्यांचा विकास केला होता. नानाजींच्या शेतीतील या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे देवेंद्र फडणवीस सरकारने २०१७ मध्ये सुरू केलेल्या ‘हवामान अनुकूल कृषी प्रकल्प’ या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या कृषी योजनेचे नामकरण, ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ असे केले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची वैशिष्ट्ये
लहरी निसर्गाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना विविध प्रकारची मदत पुरवली जात आहे. यामध्ये हवामानाला अनुकूल बियाणे, शेतीची पद्धत, अत्याधुनिका तंत्रज्ञानाचा वापर, तसेच, पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन, स्प्रिंकलर सिंचन, शेततलाव, पॉलीहाऊस, पॉली टनेल यासाठी मदत पुरवली जात आहे. तसेच शेतकऱ्यांना गटाने शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. शेती नसलेल्या शेतकऱ्यांना शेळीपालनाचे युनिट स्थापन करून दिले जात आहे. त्याचबरोबर मातीची तपासणी, नैसर्गिक संसाधनांचा अधिकाधिक वापर, शेतीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी हवामान लवचिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी गुंतवणुकीसाठी सरकारतर्फे मदत पुरवली जात आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीतून अधिक उत्पादन आणि नफा मिळत आहे. शेतकरी हवामानातील बदलांना सामोरे जाऊन त्यानुसार पिके घेत आहेत. परिणामी त्यांना त्यात यश मिळत आहे आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे.
पहिला टप्पा यशस्वी; दुसऱ्या टप्प्याला मंजुरी
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, राज्य सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली होती. त्याची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्यात आली. या प्रकल्पात ५,२२० गावांचा समावेश करण्यात आला. पूर्वीच्या १६ जिल्ह्यांमध्ये विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या दुसऱ्या टप्प्यात ६९५९ गावांची यादी मंजूर करण्यात आली. त्यासाठी अंदाजित ६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेने शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, वित्तीय सहाय्य आणि प्रशिक्षण मिळत आहे. पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणी आणि दुसऱ्या टप्प्याच्या तयारीमुळे या प्रकल्पाने राज्यातील कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होत आहे.
संबंधित लेख: