महाराष्ट्र सेवक | अहमदनगर

अहिल्यानगरमध्ये ऐतिहासिक विशेष मंत्रिमंडळ बैठक – सामाजिक विकासाची दिशा ठरवणारे निर्णय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त चौंडी येथे ६ मे २०२५ रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ ऑक्टोबर २०१६ मध्ये मराठवाड्यासाठी विशेष मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. तसेच एकनाथ शिंदे सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना १६ सप्टेंबर २०२३ रोजी मराठवाड्यासाठी आणखी एक विशेष मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त चौंडी, अहिल्यानगर या ऐतिहासिक ठिकाणी मंत्रिमंडळाची विशेष (अहिल्यानगर मंत्रिमंडळ बैठक) बैठक घेतली. या बैठकीतून मंत्रिमंडळाने राज्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील विकासासाठी मार्गदर्शक ठरतील अशा एकूण ५,५२० कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली.

महाराष्ट्राला लाभलेले अनोखे रत्न – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्माला २०२५ मध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी (ऐतिहासिक अहिल्यानगर चौंडी) या गावात झाला होता. त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याबरोबर झाल्यानंतर त्या अहिल्या शिंदे च्या अहिल्यादेवी होळकर झाल्या. त्यांचा राज्यव्यवहार हा लोकाभिमुख होता. त्यांचे राज्य लोककल्याणकारी राज्य म्हणून परिचित होते. राज्यकारभार कसा करावा हे त्यांनी दाखवून दिले. जेव्हा संपूर्ण देशावर परकीय आक्रमकांनी हल्ला करून आपल्या मंदिरांचा नाश केला. ती उद्ध्वस्त केली. ती मंदिरे, आपली श्रद्धास्थाने पुन्हा उभारण्याचे काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केले. काशी – विश्वेश्वराच्या पुनर्निर्माणाचे काम अहिल्यादेवींनी केले. देशभरातील अनेक मंदिरांचे, मठांचे, घाटांचे पुनर्निर्माण करून लोकांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांना आधार देण्याचे काम त्यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य चित्रपटांतून जगासमोर मांडणार

ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी मंदिरांच्या पुनर्निर्माणाचे काम हाती घेऊन लोकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले. त्यांच्या या कार्याची प्रेरणा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित व्यावसायिक मराठी आणि बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती राज्य सरकारतर्फे केली जाणार आहे. या चित्रपटा्च्या माध्यमातून त्यांचे कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले जाणार आहे. यासाठी लागणारा खर्च अर्थसंकल्पीय मागणीतून उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय, वसतीगृहे, मंदिर विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यात चौंडी येथील स्मृतिस्थळ संवर्धनासाठी ६८१.३२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भविष्यात हे ठिकाण धार्मिक पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरू शकते.

महिलांसाठी ‘आदिशक्ती अभियान’; मुलींसाठी खास आयटीआय

राज्यातील महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबवले जाणार आहे. यामध्ये आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन यासारख्या विषयांचा समावेश करून, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आदिशक्ती पुरस्कार’ दिला जाणार आहे. या अभियानासाठी १०.५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच अहिल्यानगर येथे मुलींसाठी खास आयटीआय सुरु करण्याचा निर्णय महिलांच्या रोजगारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शिक्षण आणि वसतीगृह योजनेला ‘होळकर’ घराण्याचा आयाम

धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृह योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ तर धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत देण्याच्या योजनेचे ‘राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. महसूल विभागाचे मुख्यालय असलेले नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि अमरावती येथे २०० विद्यार्थी (१०० मुले, १०० मुली) क्षमतेची वसतिगृहे उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. नाशिक येथील वसतिगृहाचे काम सुरू झाले असून, पुणे आणि नागपूर येथील वसतिगृहाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.

पायाभूत सुविधा आणि न्याययंत्रणांचे सक्षमीकरण

अहिल्यानगर जिल्ह्यात १०० विद्यार्थ्यांसाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ४८५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबरोबर राहुरी येथे उच्चस्तरीय दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या न्यायालयासाठी आवश्यक न्यायिक अधिकाऱ्याचे १ पद, कर्मचाऱ्यांची २० पदे आणि ४ मनुष्यबळांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मंजुरी दिली आहे. स्थानिक नागरिकांच्या न्याय मागण्यांच्या दृष्टिने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे.

धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांचा विकास

अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे. हा फक्त ऐतिहासिक वारसाचा सन्मान नाही, तर पाणीसंवर्धनाच्या दिशेने उचललेले एक ठोस पाऊल आहे. यासाठी ७५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला अभिवादन म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख धर्मस्थळांचा विकास केला जाणार आहे. यासाठी मंदिर विकास आराखड्यांतून एकूण ५५०३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धन ६८१.३२ कोटी, अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोद्धार १४७.८१ कोटी, श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा १८६५ कोटी, श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखडा २५९.५९ कोटी, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा २७५ कोटी, श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा १४४५.९७ कोटी आणि श्री क्षेत्र माहुरगड विकास आराखड्यासाठी ८२९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन महाग्राम’ योजनेचा कालावधी २०२८ पर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे ग्रामविकासाच्या प्रक्रिया अधिक बळकट होतील. मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी २०२२ ते २०२५ असा होता. तसेच नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या संभाव्य कुंभमेळ्याच्या तयारीसाठी ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश-२०२५’ जारी करण्याच निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विशेष मंत्रिमंडळ (अहिल्यानगर मंत्रिमंडळ बैठक) बैठकीच्या माध्यमातून घेतलेले हे समाजप्रबोधन, ऐतिहासिक वारसांचे जतन, महिलांचे सशक्तीकरण, धार्मिक पर्यटनाचा विकास आणि ग्रामीण भागात सोयीसुविधांची उपलब्धता करण्यावर भर देणाऱ्या आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची सेवा करताना राज्यातील विविध भागांचा विकास करण्यावर भर दिला आहे. मराठवाड्यातील पाण्याचे, उद्योगधंद्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून कार्यक्रम निश्चित केला होता. त्याची पू्र्तता आता टप्प्याटप्प्याने होत आहे. त्याचपद्धतीने अहिल्यानगर येथे झालेल्या विशेष बैठकीतून महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *