वयाची ८२ वर्षं पूर्ण केलेले सदानंद विष्णु करंदीकर हे नाव आज मानवतेचा शिखरबिंदू ठरले आहे. पत्नीच्या निधनानंतर स्वतःच्या दुःखात न अडकता करंदीकर यांनी आपल्या दुःखाला करुणेचे रूप देत, कर्करोगग्रस्त रुग्ण आणि एकूणच आपल्या समाजासमोर एक आदर्श उदाहरण उभे केले. समाजाला प्रेरणा देणाऱ्या धर्मादाय कथा आपण अनेकदा ऐकतो, अशीच सेवा व त्यागाचे माहात्म्य सांगणारी ही घटना आहे.
नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले करंदीकर दाम्पत्य हे सेवानिवृत्त झाल्यानंतर एका वृद्धाश्रमात स्थायिक झाले होते. त्यांना अपत्य नसल्याने त्या दोघांनी नेरुळमधील वृद्धश्रमात राहण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, मागच्या वर्षी सुमती करंदीकर यांचे कर्करोगाने निधन झाले. पत्नीच्या आजारपणादरम्यान त्यांनी रुग्णालयात येणाऱ्या कर्करोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होत असलेली धावपळ आणि पैशांची चणचण खूप जवळून पाहिली होती. कुटुंबातील एका सदस्याला कर्करोग झाला, तर संपूर्ण कुटुंबाची कशी वाताहत होते. याचा अनुभव करंदीकर यांनी घेतला होता. त्यांना तर स्वत:चे अपत्यही नव्हते. त्यांचे कुटुंब हे पती-पत्नीपुरतेच सीमित होते. पत्नीच्या आजारपणाच्या काळात त्यांनी कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि आर्थिक विवंचना खूप जवळून पाहिली होती. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर करंदीकर यांनी आपल्या पत्नीच्या स्मृतीप्रीत्यर्थ पंतप्रधान सहाय्यता निधी (Prime Minister’s Relief Fund-PMRF) आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी (Chief Minister Medical Relief Fund-CMRF) यांना प्रत्येकी १० लाख रुपये अशी एकूण २० लाख रुपयांची देणगी दिली आहे. या दोन्ही म्हणजेच CMRF व PMRF देणगीचा चेक करंदीकर यांनी गुरूवारी दि. २२ मे २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. ही देणगी कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे.
दुःखातून उमललेली करुणा, समाजासाठी नवसंजीवनी!
आज समाजात दुःखातून नैराश्य जन्माला येत आहे. पण करंदीकर यांनी आपल्या वेदनेतून करुणेची निर्मिती करून एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून त्यांनी उचललेले हे पाऊल समाजासाठी एक आदर्श उदाहरण ठरले आहे. सामान्यतेतील असामान्यता दर्शवणारे हे अनोखे उदाहरण आहे. त्यांच्या या कृतीतून फक्त आर्थिक मदत मिळाली नाही तर, समाजाला एक दिशा मिळाली आहे. कर्करोगग्रस्त रुग्णासह त्यांच्या कुटुंबाला एक मानसिक आधार मिळाला आहे. प्रत्येकवेळी दुसऱ्याचे दु:ख समजून घेण्यासाठी त्याच्यावरही तशीच परिस्थिती येण्याची गरज नाही. हेच आपल्या करुण समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
सकारात्मक कार्याला हजारो हत्तींचे बळ!
सदानंद करंदीकर यांनी कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ आणि पैशासाठीची तगमग जवळून पाहिली आणि त्या भावनेतून त्यांनी आपल्या पत्नीच्या स्मृतीप्रीत्यर्थ २० लाख रुपयांची देणगी कर्करोगग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे दिली. हे तेच मुख्यमंत्री आहेत; जे अवघे १७ वर्षांचे होते. त्यावेळी त्यांचे वडील कर्करोगामुळे दगावले होते. देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांना कर्करोग झाला होता. ते अनेक वर्षे त्यावर उपचार घेत होते. त्यावेळी त्यांना मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागत होते. या हॉस्पिटलमध्ये संपूर्ण देशभरातून कॅन्सरचे रुग्ण येत होते. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची. यातून देवेंद्रजींच्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली होती की, कॅन्सरचे हॉस्पिटल संख्येने कमी असल्याने या रुग्णांचे खूप हाल होत आहेत. गर्दीमुळे वेळेवर आणि व्यवस्थित उपचार मिळू शकत नाहीत. यावर त्यांनी त्यावेळी मनोमन निश्चय केला होता की, विदर्भ किंवा नागपुरात कॅन्सरवर उपचार करणारे हॉस्पिटल सुरू करायचे.
अखेर नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा अशा शेजारील राज्यातील लाखो कर्करोग रुग्णांना उपचाराची संजीवनी देणारे अद्ययावत नॅशनल कॅन्सर इन्स्टि्टयूट रुग्णालय सुरू झाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि सदानंद करंदीकर या दोघांची भावना समान होती. त्या भावनेतूनच त्या दोघांनी आपल्या क्षमतेनुसार खारीचा वाटा उचलला. या अशा प्रेरणादायी उदाहरणांमुळेच समाजात लाखो हात मदतीस धावून येतात. त्यातून हाती घेतलेल्या सकारात्मक कार्याला हजारो हत्तींचे बळ मिळते.
संबंधित लेख: