उत्तम प्रशासक | मानवगाथा

पहलगाम हल्ला: संकटकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तत्पर आणि संवेदनशील भूमिका!

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलता दाखवत महाराष्ट्रातील पर्यटकांना आधार देण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना त्वरित पहलगाम येथे पाठवले. तसेच ज्यांच्याशी फोनवर बोलणे शक्य आहे. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान महाराष्ट्रातून जम्मू आणि काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी तीन स्तरावर समन्वयाची व्यवस्था निर्माण केली. या संकटकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता निश्चितच उल्लेखनीय आहे.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी धर्म विचारून बेछूट हल्ला केला. या हल्ल्यात साधारण २६ निष्पाप पर्यटकांचा गोळ्या लागून मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा समावेश होता. ही दुर्देवी घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यातील नागरिकांसाठी मदतकार्य सुरू केले. दिल्लीतील यंत्रणांशी बोलून पहलमगाममधील पर्यटकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री गिरीश महाजन यांना राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून थेट पहलगाम येथे पाठवले. तसेच मुंबई आणि पुण्यातील विमानतळावर पर्यटकांची माहिती घेण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त केले. या दरम्यान त्यांनी आपत्कालीन बैठक घेऊन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला अलर्ट राहण्याचा इशारा दिला. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.

पहलगाम हल्ला: राज्यातील पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था

महाराष्ट्र सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया या विमान कंपन्यांच्या मदतीने विशेष विमानांची व्यवस्था करून सुमारे ५०० पर्यटकांना सुखरूप राज्यात परत आणले. पहिल्या दोन विशेष विमानांनी १८४ पर्यटक मुंबईत पोहोचले. त्यानंतर २३२ पर्यटकांसाठी इंडिगोचे तिसरे विशेष विमान तयार करण्यात आले. २५ एप्रिलला हे विशेष विमान २३२ पर्यटकांना श्रीनगरहून मुंबईला घेऊन आले. या संपूर्ण प्रक्रियेत मुंबईमधून मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदन यांच्यात समन्वय साधून प्रवाशांना व्यवस्थितपणे मुंबईत आणण्यात आले. यादरम्यान त्यांच्या निवासाची आणि जेवणाची सोयदेखील सरकारच्यावतीने करण्यात आली.

राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून श्रीनगरला गेलेले मंत्री गिरीश महाजन यांनी पर्यटकांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला आणि राज्य सरकार तुमच्या सोबत आहे; असा विश्वास देत, सर्व पर्यटकांना विशेष विमानाने महाराष्ट्रात आणले जाईल, असे सांगितले. त्यानंतर या सर्व पर्यटकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्र्यानीही त्यांना विश्वास देत पर्यटकांच्या सुरक्षित परतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक पर्यटक जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्यांना दुखापत झाली. काही जणांना हल्ल्यात गंभीर इजादेखील झाली. अशा पर्यटकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी बोलून त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1915084041101181413

मृतांना श्रद्धांजली व अंत्यविधीसाठी सहकार्य

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात एकूण २६ पर्यटक मृत्युमुखी पडले. त्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटक होते. या सहा पर्यटकांमध्ये ३ डोंबिवली, २ पुणे आणि १ पनवेलचे रहिवाशी होते. त्यांची नावे अतुल माने, संजय लेले, हेमंत जोशी (सर्व राहणार डोंबिवली), संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे (राहणार पुणे) आणि दिलीप देसाले (राहणार पनवेल) अशी होती. या ६ जणांचे मृतदेह विशेष विमानाने राज्य सरकारतर्फे श्रीनगरमधून महाराष्ट्रात आणण्यात आले. त्यानंतर ते त्यांच्या स्थानिक ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा राज्य सरकारने घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली येथे जाऊन मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना राज्य सरकारतर्फे आवश्यक ती मदत पुरवण्याचे आश्वासन दिले.

पीडित कुटुंबाला मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात!

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचादेखील मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे जगदाळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यात घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबियांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगदाळे कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांच्या कुटुंबाला पुन्हा एकदा उभं राहता यावे, यासाठी संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिच्यासाठी डी. वाय. पाटील समुहाचे अध्यक्ष अजित पाटील यांच्याशी बोलून तिच्या नोकरीसाठी शिफारस केली. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यावेळी संतोष जगदाळे हे त्यांच्या कुटुंबासोबत तिथेच होते. दहशतवाद्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीसमोर त्यांना गोळ्या झाडल्या होत्या. जगदाळे हे एकमेव त्यांच्या कुटुंबाचे आधार होते. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी जेव्हा ही माहिती समोर आली. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परपणा आणि संवेदनशीलपणा दाखवत आसावरी जगदाळे हिच्यासाठी डी. वाय. पाटील संस्थेत नोकरी मिळवण्यासाठी शिफारस केली.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1917145783276888436

मृतांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत; सरकारी नोकरीचेही आश्वासन!

दरम्यान, मंगळवारी (दि. २९ एप्रिल) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. या हल्ल्यात कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबांवर मोठा आघात कोसळला आहे. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर ज्या कुटुंबातील मुलांचा शिक्षणाचा, नोकरीचा प्रश्न आहे. त्यांना सरकारतर्फे शिक्षणाची सुविधा पुरवली जाणार आहे. त्यांना सरकारच्यावतीने नोकरी देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिच्या नोकरीसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून शिफारस केली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या या अनपेक्षित दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी दाखवलेली तत्परता आणि सहवेदना नक्कीच उल्लेखनीय आहे. राज्यातील नागरिक संकटात असल्याचे कळल्यावर त्यांच्या मदतीसाठी मंत्रिमंडळातील सहकारी पाठवून, पर्यटकांशी थेट संवाद साधून त्यांना धीर दिला. या कृतीतून मुख्यमंत्र्यांनी आपल्या जबाबदारीचे आणि मानवतेचे दर्शन घडवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *